माझी सुखाची आणि आनंदाची कल्पना एकदम साधी, सोप्पी (आणि बरीचशी आळसावलेली) आहे. माझे असे जगण्याचे स्वप्न आहे...
सकाळी पक्षांच्या चिवचिवण्याने जाग यावी. उशिरा नव्हे पण जास्त लौकर पण नव्हे. उजाडलेले असावे पण लख्ख ऊन नसावे. घराच्या आंगणात एका आरामखुर्चीत आरामात बसून गरमा-गरम, वाफाळलेला आले घातलेला बायकोच्या हातचा चहा प्यावा. बरोबरीला मस्त कुरकुरीत खारी असावी. चहा पिताना पेपर चाळावा (जो साधारणपणे १० मिनिटात वाचून होतो) नंतर बाजूच्याच टेबलावर पडलेलं माझ्या आवडीचे कोणतेतरी पुस्तक उचलून वाचावे, एखादी छानदार कविता वाचावी. हवेत गारवा असावा पण थंडी नाही. चहा झाल्यावर अशीच एक अंगणात चक्कर मारावी, किंवा तसेच आराम खुर्चीत बसून बाजुला पडलेल पेन आणि पेपर उचलावे. मनातले काही शब्द पानावर टिपावेत, हातून काही अर्थगर्भ लिहिले जावे. वाचन आणि लेखनात १-२-३ तास कसे जावेत हे कळुच नये. नंतर आजूबाजूला सहज बघत बसावे.उन्हें वर आलेली असावीत. मग घरात एक चक्कर टाकावी. बायाकोबरोबर गुजगोष्टी व्हाव्यात. आई बाबांबरोबर चार गप्पा व्हाव्यात. तोपर्यंत जेवणाची वेळ व्हावी. मस्त गरमागरम जेवण व्हावे. वरण भात, कटाची आमटी, मऊ गरम पोळ्या, कारले-तोंडले-वांगे सोडून कुठलीही भाजी असावी. मटर पनीर असेल तर उत्तम. आंब्याच्या सीजनला मस्त थंड हप्पूस आंब्याचा आमरस वर साजूक तूप. जेवणानन्तर शतपावली आणि नन्तर एका अर्ध्या तासाची वामकुक्षी. दुपारचे उठावे आणि म्यूजिक सिस्टम वर सुंदर गाणी ऐकत बसावे, किंवा बासरीचे सुर ऐकत डोळे मिटून हरवून जावे. सन्ध्याकाळचा चहा पुढ्यात यावा. चहाचे घोट घेता घेता घराच्यान्शी गप्पा. संध्याकाळी घराबाहेर फिरायला पडावे. मित्र मंडळाला भेट द्यावी. शिव्या घालत घालत जुन्या गोष्टी आठवत आठवत हसावे, काही क्षण डोळ्यांत पाणी यावे. उन्हें परतलेली असावीत तेव्हा मन कातरवेडे व्हावे म्हणजे त्या कातरवेळी मन अस्वस्थ व्हावे आणि त्या क्षणी काहीतरी भन्नाट सुचावे, समोर कागद पेन असावे त्यावर सर सर ते विचार उतरवून काढावेत. मन मोकळे झाल्यावर मुसळधार पावसानन्तर आकाश जसे स्वच्छ होते तसे वाटावे. रात्री साधे जेवण असावे, खिचड़ी किंवा तसेच काहीतरी. जेवणानन्तर ताक पिउन अंगणात असलेल्या पलंगावर पडावे, अथांग आकाश आणि लुकलुकणारे आकाशातले तारे बघत...
No comments:
Post a Comment