Sunday, November 6, 2011

एक चतुर्थांश चक्रव्यूह

पंचविशी पार केली कि बहुतेक सर्वांच्या आयुष्यात असा काळ येतो कि तुम्ही गर्दी बरोबर असता पण तरीही एकटे असता. तुम्हाला अशी जाणीव होऊ लागते कि आता आपली स्वतःची ओळख होणे गरजेचे आहे. मी कोण आहे, माझा ह्या भूतलावरचा ‘उद्देश’ काय आहे असे प्रश्न सतावू लागतात तुम्हाला. 

आजू-बाजूच्या स्वार्थी लांडग्यांची ओळख तुम्हाला अस्वस्थ करून सोडते. आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे तुमच्या हातातून निसटून गेले आहेत त्यांच्या आठवणीनी मन घायाळ होऊ लागते. ज्या व्यक्ती तुमच्या पासून दूर गेल्या आहेत त्यांच्याशी तुम्ही केलेल्या प्रतारणेचे सुद्धा चटके बसू लागतात मनाला.

तुम्ही तुमच्या नोकरीकडे बघता आणि तुम्हाला वाटू लागते कि हेच हवे होते का मला आयुष्यात? असेच काम करायचे होते का मला? नोकरीतील स्वारस्य पण हळूहळू कमी होऊ लागते. पण आतापर्यंत तुम्ही आयुष्याच्या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनलेले असता. नोकरी सोडून काय करायचे हे भय तोपर्यंत मनात ठाण मांडून बसलेले असतेच. भीती डोळ्यावरची पट्टी काढूच देत नाही.

शाळा-कॉलेज मधली तुमची मस्ती आठवणी बनून मनाला छळू लागते, डोळ्याच्या कडा ओलावू लागते. काळाचे घड्याळ मागे फिरवून परत बालपणीचे अबोध निरागस दिवस परत आणावेत असे वाटू लागते.
तुमचा स्वतःचा शोध सुरूच असतो, रात्रीच्या अंधारात सुधा डोळे टक्क उघडे असतात, आणि मन विचारांच्या जंजाळात. आपल्या सीमचे काटेरी कुंपण आपल्यालाच टोचू लागते. तुमचे मन आशा-निराशेच्या तराजूत हिंदकाळू लागते.

पैशासाठी विकलेल्या, उराशी जपलेल्या पंखांच्या पाठीवरील जखमा अजूनच ठस-ठसू लागतात. 

घराची, आई-बाबांची, आजी-आजोबांचं, भावंडांची आणि नातेवाईकांची अनिवार ओढ वाटू लागते. परंतु पुढच्याच क्षणी, ते आपल्याला कधी न कधी सोडून जाणारा आहेत ह्याची चिंता चीतेसारखी जाळू लागते. एकटे एकटे वाटून, कातरवेळी मनाची अवस्था विचारधारात हरवलेल्या वेड्या पाखरा सारखी होते…

प्रश्न तर हजारो असतात पण उत्तरे अनुत्तरीत राहतात. आपण आयुष्याच्या चाक्रव्युहातील अभिमन्यू झाल्याची तीव्र जाणीव होऊ लागते आणि ह्यातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याची जाणीव शक्तिहीन करून टाकते. हाच तो एक चतुर्थांश चक्रव्यूह…