Friday, October 14, 2011

मी असा

धुंद मला ना मद्याची, 
ही तर आहे गद्या -पद्याची...

भूक मला ना खाण्याची, 
ही तर सुंदर गाण्याची...

भीती मला ना मरण्याची, 
पण भाव मनातील सरण्याची...

वेड मला ना द्रव्याचे, 
हे तर मुग्ध काव्याचे...

मोहिनी ना मला मोहिनीची, 
ही तर वर्षाधारांची...

भूल मला ना नोटांची, 
ही तर वेड्या बेटांची...

ओढ मला ना फिरण्याची, 
पण फिरताना शब्दांना भेटण्याची... 

संध्याकाळ

आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यांमधले थिजले आसू,
पायांमधले त्राण सरले अन ओठांवरले विरले हासू...

अश्रूंच्या कोमट पाण्याने पत्रातील शाई भिजली,
डोळ्यांपुढली अक्षरे दुःखाच्या धुक्यात विरली...

मनातले कढ, आवेग आवरून आवरून निशब्द होत गेले,
मारून टाकलेल्या भावनांमुळे मन सुन्न होत गेले..

हातातून निसटून गेलेल्या क्षणांची आठवण अस्वस्थ करत आहे,
ह्या कातरवेळी मन मावळत्या सूर्यासारखे अंधारामध्ये बुडत आहे...

आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यांमधले थिजले आसू,
पायांमधले त्राण सरले अन ओठांवरले विरले हासू...

पुन्हा पाउस

भेटलो आज पावसाला बऱ्याच दिवसांनी,
केल्या काही गुज-गोष्टी बऱ्याच दिवसांनी.

जुन्या मित्राच्या जुन्या आठवणी, भेटल्या पुन्हा नव्या होऊनी,
भेटल्या त्या पावसाच्या सारी अन गेल्या पुन्हा भिजवूनी.

पुन्हा पाउस घेऊन आला आठवांच्या सरी,
वर्षू लागल्या आसवांच्या धारा पुन्हा भुईवरी.

जुने दिवस, जुने क्षण पुन्हा झाले नवे,
भर पावसात, थेंबांच्या धारात मन पण होई ओले.

ढगाळ कुंद हवा आणि मातीचा सुवास,
तुझे ते शब्द, "अशा वेळी तू जवळ हवास..."

असे का मनाचे पावसाशी नाते,
क्षणामध्ये वाटू लागते जग रिते-रिते.

पावसाला मित्र मानू की मानू माझा शत्रू,
डोळ्यात थेंबांच्या सरी देतो, पण कविता लागते पाझरू.